८० अंश कोनातील पायऱ्या, थरारक किल्ले हरिहर
हरिहर किल्ल्याचे नाव ऐकलं नसेल,त्याबद्दल माहिती ऐकली नसेल,त्याचे थरारक व्हिडिओ युट्युब किंवा इतर सोशल मीडियावर पाहिले नसतील असा महाराष्ट्रात क्वचितच एखादा व्यक्ती आढळेल इतका हरिहर किल्ला त्याच्या थरारकतेसाठी,ट्रेकर्सना ऍडव्हेंचरसाठी प्रसिद्ध आहे.ट्रेकिंग करणाऱ्या व न करणाऱ्या सहसा प्रत्येकाला हरिहर किल्ल्याचे किमान नाव तरी ऐकून आहे.हरिहर किल्ल्याला इतकी प्रसिद्धी मिळण्यास कारण म्हणजेच त्याच्या ८०° कोनातील कातळ कोरीव उभ्या उंचीच्या पायऱ्या.या पायऱ्यांची,या किल्ल्याची मोहिनी प्रत्यक्ष इंग्रजांना देखील पडलेली होती त्यामुळेच त्यांनी या किल्ल्याच्या पायऱ्या उध्वस्त न करता आहे तसे याचे सौंदर्य अबाधित राहू दिले. अन्यथा महाराष्ट्रामधील बऱ्याचशा किल्ल्यांची नासधूस इंग्रजांनी करून त्याच्या पायऱ्या पूर्णपणे उध्वस्त केल्या आहेत जेणेकरून तिथे कोणी पोहोचू शकू नये.नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून जवळ असलेला,साधारणपणे नाशिक पासून तास- सव्वा तासाच्या अंतरावर असलेला हा किल्ला अगदी प्रत्येकालाच आकर्शून घेत असतो. दुरून पाहताक्षणीच याचे सौंदर्य,याचा बलाढ्यपणा व यामागील असलेला थरार या हरिहर किल्ल्याच्या जमेच्या बाजू. गुडघाभर उंचीच्या पायऱ्या, या पायऱ्या चढण्यासाठी दोन्ही बाजूला केलेली खाचांची व्यवस्था,बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर गडशिखरावर जाण्यासाठी डोंगर कोरून बनविलेली व्यवस्थित जागा,शिखरावरती डौलाने फडकणारा भगवा... या व अशा इतर आश्चर्यचकित करणाऱ्या तत्कालीन मराठ्यांच्या सामर्थ्याची, प्रयत्नांच्या पराकाष्ठेची, वीरतेची साक्ष देणाऱ्या या बाबी पाहण्यासाठी प्रत्येकाने एकदा हरिहर किल्ला पाहायलाच हवा.
हरिहर किल्ल्यालाच हर्षगड असे देखील म्हणतात.या किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो तो मुळात हर्षेवाडी या गावापासून.त्यामुळेच याला हर्षगड असे देखील नाव आहे.हर्षेवाडी किंवा निरगुडपाडा या ठिकाणावरून या किल्ल्यासाठीचा ट्रेक सुरू करता येतो. समुद्रसपाटीपासून हरिहर किल्ल्याची उंची सुमारे ३६७६ फुट इतकी आहे. अवघड श्रेणीमध्ये मोडणारा हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारामध्ये येतो. अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला शहाजीराजांनी १६३६ मध्ये निजामशाहीची पुनर्स्थापना करताना त्र्यंबकगड किल्ल्यासोबत जिंकून घेतल्याची नोंद इतिहासामध्ये आढळते.यादव काळामध्ये साधारणपणे १४ व्या शतकामध्ये हा किल्ला बांधला असावा असे मत मांडले जाते.यादव काळापासून ते निजामापर्यंत, निजामानंतर मराठ्यांच्या युद्धांमध्ये व त्यानंतर ब्रिटिशांच्या संघर्षामध्ये या किल्ल्याने अनेक लढाया पाहिलेल्या आहेत.
हरिहर किल्ला ज्यासाठी प्रसिद्ध आहे त्या म्हणजे त्याच्या ऐंशी अंशातील उभ्या सरळसोट पायऱ्या.या एकूण ११७ पायऱ्या असून पहिल्या पायरी पासून शेवटच्या पायरी पर्यंतचे अंतरच २०० फूट इतके आहे. हरिहर किल्ल्याला पोहोचायचे झाले तर या पायऱ्या शिवाय गत्यंतर नाही कारण पायऱ्यांच्या उजव्या व डावीकडील बाजू तीव्र उभ्या असल्यामुळे या गुळगुळीत उभ्या बाजूंवर चढून जाणे अजिबात शक्य नाही.तत्कालीन किल्ल्याचे बांधकाम करताना किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टीचा किती प्रकर्षाने विचार केला असेल याची कल्पना येऊन जाते.या पायऱ्या चढताना आधारासाठी तसेच अपघात होऊ नयेत यासाठी या पायऱ्यांनाच उजव्या-डाव्या बाजूने हात धरून ठेवता येईल अशा प्रकारच्या खाचा करून ठेवलेल्या दिसून येतात.अशीच काहीशी रचना कोथळीगड,न्हावीगड या ठिकाणी देखील दिसून येते.
************************************
हरिहर किल्ल्यावरील ट्रेकचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा.
आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला जॉईन होण्यासाठी येथे टच करा.
गड किल्ले भ्रमंती तसेच ट्रेकिंग संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी येथे टच करा.
*************************************
हरिहर किल्ल्यावरील ट्रेकमधील सहभागी सदस्य :
देविदास घाडगे
मनोहर दरगोडे
सुधीर पवार
कल्पेश हिरे
भरत पवार
श्याम रसाळ
तुळशीराम बागुल
कृष्णा वळवी
सुहास कोळेकर
************************************
काही क्षणचित्रे




































Comments