चला चला बेल वाजली , पाणी प्यायची वेळ झाली.
| आमचा वॉटर बेल उपक्रम |
नुकताच इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये वाचण्यात आलं की दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उपिनअंगडी या गावातील इंद्रप्रस्थ या विद्यालयामध्ये नुकताच एक उपक्रम घेण्यात आला.त्या उपक्रमाची सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून दखल घेतली गेली. त्याला कारणही तसेच होते. या विद्यालयांमध्ये राबविला गेलेला उपक्रम होता विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्यासंदर्भात आणि उपक्रमाचे नाव होते वॉटर बेल.याअंतर्गत त्या विद्यालयातील शिक्षकांनी एका ठराविक वेळी तासिकांच्या वेळी जसे घंटेचे टोल पडतात,त्याच प्रकारे एका निश्चित वेळी एका घंटेचा टोल पडण्याची सवय निर्माण केली होती. घंटेचा टोल पडला की सर्व विद्यार्थी आपापल्या बॕगांमधून पाण्याच्या बॉटल काढायचे व ठराविक मात्रेमध्ये पाणी प्यायचे.
या उपक्रमाचा हेतू एकच होता की विद्यार्थ्यांनी दिवसभरातून जास्तीत जास्त पाणी पिले गेलं पाहिजे. दिवसभरातून पिले गेलेले भरपूर पाणी हे वेगवेगळ्या आजारांवरती जालीम औषधाचे काम करते. वेगवेगळ्या वैज्ञानिक संशोधनांमधून असे निदर्शनास आले आहे की अधिकाधिक आजार हे केवळ वेळेवर पाणी पिले न गेल्यामुळे होतात. पाणी आपल्या शरीरामधील सांध्यांमध्ये एका वंगण असल्याप्रमाणे काम करते .त्यामुळे जितके अधिकाधिक पाणी शरीरामध्ये,तितकेच शरीराचे संतुलन सुद्धा योग्य प्रमाणामध्ये राखले जाते. बद्धकोष्ट, मलावरोध ,पचन न होणे अशा विविध विकारांवरती वेळेवर पाणी पिणे हा एकमेव अधिक फायदेशीर इलाज ठरू शकतो . त्यामुळे शालेय पातळीवर या बाबतीमध्ये प्रयत्न होणे खरच गरजेचे असते. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय माननीय भुवनेश्वरी देवी मॅडम यांनी सुद्धा या उपक्रमाची वाखाणणी केली असून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्या संदर्भात त्या अधिक अनुकूल असलेल्या दिसून येतात.त्या अनुषंगाने मी माझ्या छोट्याशा आदिवासी पाड्यावरील शाळेमध्ये सुद्धा हा वॉटर बेल उपक्रम घेण्याचे व यशस्वीपणे राबविण्याचे ठरवले व त्या दृष्टीने आमची टीम लगेच सज्ज झाली. आम्ही मोबाईल मध्ये दिवसभरातून चार वेळा वॉटर बेलचे अलार्म देतो व हे अलार्म वाजले की विद्यार्थी आपापल्या पाण्याच्या बॉटल्स काढतात व पाणी पितात .यासंदर्भात वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक सक्षम व्हावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टर्स तसेच आरोग्य मदतनिसांची ही याकामी मदत घेण्यात आलेली आहे .त्यांनीसुद्धा शाळेवर येऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून वेळेवर पाणी पिण्याच्या सवयीचे उद्बोधन केलेले आहे. यापुढील आमचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा या उपक्रमांमध्ये सामील करून घेण्याचा असणार आहे .आमच्या शाळेतील विविध उपक्रम ,बैठका किंवा सांस्कृतिक संमेलनांमधून आम्ही पालकांचे उद्बोधन यासंदर्भात अधिकाधिक करणार आहोत .आमच्या छोट्याशा आदिवासी पाड्यावरील मातांचे अधिकाधिक उद्बोधन करून त्यांच्यामध्ये या वॉटर बेल उपक्रमाबद्दल जाणीव-जागृती करण्यासंदर्भात आमचा प्रथम प्राधान्य असणार आहे. आमचे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक सुदृढ व सक्षम होतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
वॉटर बेलसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Comments
मी पण हा उपक्रम घेईल,माझ्या शाळेत,,,,,